भारताची घटना निर्मिती | Indian Constitution

स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली  होती. १९२२ मध्ये महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम संविधान सभा या शब्दाचा स्पष्ट उल्लेख न करता अशा प्रकारच्या सभेची कल्पना केली. १९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जाते. मानवेंद्रनाथ रॉय साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. १९३८ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने संविधान सभेची मागणी केली. १९४० मध्ये लॉर्ड लिनलिथगो याच्या ‘ऑगस्ट ऑफर’द्वारे इंग्रज सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना भारतीयांनीच तयार करावी असे मान्य केले. शेवटी मे १९४६ मधील कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.

संविधान सभेची निर्मिती व रचना | Sanvidhan Sabha:

-संविधान सभेत एकूण ३८९ सदस्य असतील. (त्यापैकी २९२ – ब्रिटिश प्रांताकडून निवडून दिले जातील, ४ सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून म्हणजेच दिल्ली, अजमेर-मारवाड, कूर्ग व बलुचिस्तान तर ९३ सदस्य भारतीय संस्थानिकांचे असतील.)

-हे सदस्य १९३५ च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळांच्या सदस्यांकडून निवडून दिले जातील.

-साधारणतः १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण.

-जागांचे विभाजन तीन प्रमुख गटांमध्ये केले जाईल – शीख, मुस्लिम व साधारण

-ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या २९६ जागांसाठी जुलै-ऑगस्ट १९४६ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये काँग्रेसने २०८ जागा (९ जागा वगळता सर्वसाधारण जागा), मुस्लिम लीगने ७३ जागा (केवळ ५ जागा वगळता सर्व मुस्लिम जागा) मिळवल्या. उर्वरित १५ जागांमध्ये प्रत्येकी १ जागा युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेडूल्ड कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेडूल्ड कास्ट फेडरेशन, शीख (गैर-काँग्रेस) आणि कम्युनिस्ट या पक्षांना मिळाली. तर ८ जागा अपक्षांना मिळाल्या.

-एकूण जागांपैकी १५ जागा महिलांना (सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित इत्यादी)

संस्थानिकांच्या ९३ जागा मात्र भरल्या जाऊ शकल्या नाहीत.

संविधान सभेचे कामकाज:

९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. या बैठकीला २११ सदस्य हजर होते. जेष्ठतम असलेल्या डॉ. सच्चितानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

-११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष व H C मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

-B N राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली.

१३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली व २२ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला.

महत्वाचे मुद्दे:

मे १९४९ मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले.

२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.

२४ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेत भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान  स्वीकृत केले.

– २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत २६ जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले.

संविधान सभेच्या समित्या व अध्यक्ष

संविधान सभेच्या प्रमुख ८ समित्या होत्या.

१. मसुदा समिती – अध्यक्ष – बाबासाहेब आंबेडकर

२. संघराज्य घटना समिती – अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू

३. संघराज्य अधिकार समिती – अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू

४. प्रांतिक घटना समिती – अध्यक्ष – सरदार वल्लभभाई पटेल

५. कार्यपद्धती नियमन समिती – अध्यक्ष – डॉ. राजेंद्र प्रसाद

६. राज्यांशी चर्चेसाठी समिती – अध्यक्ष – जवाहरलाल नेहरू

७. सुकाणू समिती – अध्यक्ष – एम. के. मुन्शी

८. मूलभूत हक्क व अल्पसंख्यांकविषयक सल्लागार समिती – अध्यक्ष – सरदार वल्लभभाई पटेल

    (i) मूलभूत हक्क उपसमिती – अध्यक्ष – जे. बी. कृपलानी

    (ii) अल्पसंख्यांक उप समिती – अध्यक्ष – एच. सी. मुखर्जी

मसुदा समिती | Masuda Samiti:

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती यामध्ये ७ सदस्य होते.

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२. एन. गोपालस्वामी अय्यंगार

३. अलादी कृष्णस्वामी अय्यर

४. सईद अहमद सादुल्लाह

५. के. एम. मुन्शी

६. एन. माधव राव (बी. एल. मित्तर यांनी अनारोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.)

७. टी. टी. कृष्णम्माचारी (१९४८ मध्ये डी. पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर कृष्णम्माचारी यांची नियुक्ती करण्यात आली.)

घटनेची स्वीकृती:

बाबासाहेब आंबेडकरांनी ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. मसुद्याचे तीनदा वाचन व चर्चा झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. त्या दिवशी उपस्थित असलेल्या २८४ सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत एक प्रास्ताविक, २२ भाग, ३९५ कलमे व ८ अनुसूचीचा समावेश होता.

घटनेचा अंमल:

घटनेचा अंमल २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाला. (घटनेचा प्रारंभ) परंतु घटनेच्या कलम ३९४ नुसार घटनेतील काही तरतुदींचा अंमल २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच सुरु झाला. उदा. कलम ५, ६, ७, ८, ९, ६०, ३२४, ३६६, ३६७, ३७९, ३८०, ३८८, ३९१, ३९२ आणि ३९३ या कलमांमधील नागरिकता, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि लघुशीर्षक याबद्दलच्या तरतुदी.

अशा रीतीने ६४ लाख रुपये खर्च करून २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या कालावधीत संविधान सभेची ११ सत्रे झाली. त्यांदरम्यान संविधान सभेने १६६ दिवस काम केले. तसेच घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे ६० देशांचा विचार केला.

भारतीय राज्यघटनेबद्दलच्या काही महत्वाच्या तारखा:

  • ५ ते ७ डिसेंबर १९३४ – संविधान सभेची मागणी
  • ९ ते २३ डिसेंबर १९४६ – संविधान सभेची पहिली बैठक
  • ११ डिसेंबर १९४६ – डॉ. राजेंद्रप्रसाद अध्यक्षपदी नियुक्ती
  • १३ डिसेंबर १९४६ – पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला
  • २२ जानेवारी १९४७ – उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला.
  • १८ जुलै १९४७ – भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर
  • २२ जुलै १९४७ – राष्ट्रीय ध्वज स्वीकृत
  • १४ ऑगस्ट १९४७ – संविधान सभेला सार्वभौमत्व प्राप्त
  • २९ ऑगस्ट १९४७ – मसुदा समितीची स्थापना
  • ०४ नोव्हेंबर १९४८ – घटनेचा अंतिम मसुदा सादर
  • २६ नोव्हेंबर १९४९ – भारतीय राज्यघटना स्वीकृत
  • २४ जानेवारी १९५० – राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत स्वीकृत
  • २४ जानेवारी १९५० – संविधान समितीची विशेष बैठक
  • २६ जानेवारी १९५० – भारतीय घटनेची अंमलबजावणी
  • २६ जानेवारी १९५० – सर्वोच्च न्यायालयाची स्थापना
  • १८ डिसेंबर १९७६ – ४२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली.
  • १२ ऑक्टोबर २००५ – माहितीचा अधिकार लागू
  • ४ ऑक्टोबर २०१३ – NOTA चा वापर सुरु
संविधान सभेचे कामकाज किती दिवस चालले?

६४ लाख रुपये खर्च करून २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या कालावधीत संविधान सभेची ११ सत्रे झाली. त्यांदरम्यान संविधान सभेने १६६ दिवस काम केले. तसेच घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे ६० देशांचा विचार केला.

घटनात्मक समितीचे सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती?

B N राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली

संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली?

संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ ला भरली होती.

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us